संतवाणी
नाही केली आटी।काही मानदंभासाटी।।
कोणी भाग्यवंत।तया कळेल उचित।।
तुका म्हणे झरा।आहे मुळीचा चि खरा।।
अर्थ- मान मिळवण्यासाठी मी कधीच प्रयत्न केला नाही।भाग्यवंताला योग्य काय ते जरूर कळेल। तुकाराम महाराज म्हणतात हा झरा, ही प्रेरणा मुळातूनच आहे.।
आपल्याला समाजात प्रतिष्ठा मिळावी, आपला मानसन्मान व्हावा, अशी बहुतेकांची अपेक्षा असते. अशी अपेक्षा असणे सामान्यतः गैरही नव्हे. तथापि असे घडण्यासाठी आवश्यक अशी गुणवत्ता, कर्तृत्व, नीतिमत्ता, द्रष्टेपणा असे काहीतरी असावे लागते. तसे काहीही नसताना तसे असल्याचे भासवून सत्कार करून घेणारे, सन्मान मिळवणारे दांभिक लोक जसे असतात, तसा मी नाही, असे ते आवर्जून नोंदवत आहेत. आपण जे काही करीत आहोत, तो मानदंभासाठी केलेला बाह्यात्कारी बडेजाव नाही, कृत्रिम खटाटोप नाही, नखरेबाज प्रदर्शन नाही, लोकांना फसविण्यासाठी धारण केलेला मुखवटा नाही, तर तो आपल्या आतून उत्कटपणे प्रकट झालेला उत्स्फूर्त अविष्कार आहे. तो नैसर्गिक उमाळा नसताना खोदून - खणून काढलेला कोरडा पाट नाही, तर अस्तित्वाच्या गाभ्यातून स्वयंप्रेरणेने मुसंडी मारून प्रवाहित झालेला जिवंत जिव्हाळ्याचा झरा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

No comments:
Post a Comment