EDUCATION CENTER

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

Friday, July 27, 2018

पाखांड्यांनीं पाठी पुरविला दुमाला

पाखांड्यांनीं पाठी पुरविला दुमाला ।
तेथें मी विठ्ठला काय बोलों ? ।।१।।
कांद्याचा खाणार चोजवी कस्तुरी ।
आपुलें भिकारी अर्थ नेणे ।।ध्रु.।।
न कळे तें मज पुसती छळूनी ।
लागतां चरणीं न सोडिती ।।२।।
तुझ्या पांयांविण दुजें नेणें कांहीं ।
तूं चि सर्वांठायीं एक मज ।।३।।
तुका म्हणे, 'खीळ पडो त्यांच्या तोंडा' ।
किती बोलों भांडां वादकांशीं ।।४।।

अर्थ व चिंतन -
भांडणाऱ्यानं 'वाद' किती घालावा याला काही मर्यादा नसते. तुकोबांशी वाद घालणारे 'भांडखोर' मर्यादा सोडूनच भांडत असल्याचं तुकोबा सांगतात. 'मला माहित नसलेल्या गोष्टीबद्दल मुद्दाम विचारून छळायचं' हा जणू या 'पाखंडी' लोकांनी बांधलेला चंगच होता. मी कुठंही असू द्या, मला 'छळण्यासाठी' हे लोक माझा अक्षरशः 'पिच्छा'च सोडत नव्हते. 'पाय धरले तरी' हे मला छळायचं सोडत नसल्याचं अगदी उद्विग्नपणे तुकोबा सांगतात.

तुकोबांनी त्यांच्या शब्दात मांडलेली ही 'त्यांच्या छळाची कहाणी' लिहिताना आणि समजून घेताना आपल्यालाच 'जड-जड' वाटायला लागतं. त्रास देणारे तुकोबांना कशा पद्धतीने 'छळतात' हे वाचूनच आपल्याही मनाला वेदना होतात. 'तुकोबांनी किती सहन केलं' याचा अनुभव मिळतो.

काही लोक भक्तीला नाकारून ज्ञानाला मोठं मानणारे होते. ते 'पंढरपूर, विठ्ठल, भक्ती' यावर संशय घ्यायचे. तुकोबा यांनाच 'पाखंडी' म्हणजेच 'नास्तिक' असं म्हणतात. आणि मग हे ज्ञानी लोक भक्ती करणाऱ्या तुकोबांना कसं छळायचे हे सांगताना ते म्हणतात, "या पाखंड्यांनी माझा चांगलाच 'पिच्छा' धरला आहे. (हे माझ्या मागेच लागले आहेत.) विठ्ठला, मी यांना काय बोलू?" हे काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीत.

आणि हो, विठ्ठला "मला तुझ्या पायांवाचून दुसरं काहीही नाही रे! (तू आणि तुझे पाय. बाकी शास्राचं मला काय करायचं?) माझ्यासाठी सर्व ठिकाणी एक तूच आहेस."

मला तूच एकमेव असताना, हे लोक मात्र काही माझा पिच्छाच सोडायला तयार नाहीत. कधी कधी तर असं वाटतं, "या पाखंडी लोकांची 'दातखीळ' बसो. त्यांचं तोंड बंद होवो. (त्याशिवाय हे कोणत्याच मार्गाने गप्प बसणार नाहीत.) अहो, शेवटी या 'भांडखोर' लोकांसोबत 'वाद' तरी किती घालायचा? यांना समजून तरी किती सांगायचं?"

असा हा तुकोबांच्या घडण्याचा प्रवास आहे. 'भक्तिमार्गाने' समाजाचं होईल तेवढं भलं करता यावं, ही त्यांची अपेक्षा आणि म्हणून त्या मार्गाने त्यांचं आचरण. पण 'कर्मकांड' नाकारून भक्तिमार्ग दाखवणाऱ्या तुकोबांना 'पाखंड्यांनी छळणं' हा या मार्गातील मोठा 'अवरोधक' होता. त्याला पार करणे सहज आणि सोपं नव्हतं. पण तुकोबांनी ते पार केलं, आणि पैलतीराला पोहचले.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers