*संतवाणी*
*पाया झाला नारू । तेथे बांधला कापरु । तेथे बिबव्याचे काम । अधमासी तो अधम।।*
*रुसला गुलाम । धनी करतो सलाम । तेथे चाकराचे काम । अधमासी तो अधम।।*
*देव्हाऱ्यावरी विंचू आला ।देवपूजा नावडे त्याला । तेथे पैजारेचे काम । अधमासी तो अधम।।*
*तुका म्हणे जाती । जातीसाठी खाती माती।।*
_*अर्थ*: पायाला नारू झाला तर त्यावर कापूर बांधून काय उपयोग? तेथे बिबवा घातला तरच नारू बरा होईल.।।_
_घरचा नोकर रुसला तर धण्याचा इलाज चालत नाही. पण दुसरा नोकर त्याची समजूत काढू शकतो.।।_
_देव्हाऱ्यावर विंचू आला तर तो देवपूजेसाठी आला असे समजू नये. नांगी मारणे हा त्याचा स्वभाव आहे. त्याला माफ केले तरी तो नांगी मारणारच अशा वेळी चप्पल हातात मिळाली तरी चपलेने त्याला मारावे. देवाला चप्पल लागेल म्हणून विंचवाला सोडू नये._
_*लोकं त्यांच्या जातीसाठी माती खात असतात म्हणून जशास तसे वागावे.।।*_
_संत तुकाराम महाराज समाजातील विषमतेविरुद्ध लढा देत होते. तेव्हा काही लोकं महाराजांना म्हणाले असतील की आपणासारख्या महाथोर साधुस अशी कठोर, तीव्र व मर्मभेदक शब्द शोभत नाहीत._
_तुकारामांची त्याबद्दलची भावना अशी होती कि समाजाला झालेला रोग भयंकर आहे हा रोग समाजातील उच्च निचतेमुळे झालेला आहे. साध्या औषधाने हा रोग बरा होणार नाही. या सामाजिक जखमेवर तीव्र पद्धतीचा उपचार पाहिजे, त्यासाठी प्रभावी औषध वापरले पाहिजे._
_विंचू देव्हाऱ्यावर गेला तर तो देवपूजेसाठी गेला असे समजू नये. विंचवाचा नांगी मारण्याचा गुणधर्म तो सोडणार नाही. अशावेळी हातात चप्पल आली तर, त्या चपलेने तो विंचू मारावा. पाप लागणार नाही असे समर्पक उदा देऊन प्रभावी उपाय त्यांनी स्पष्ट केला आहे._

No comments:
Post a Comment